उस्मानाबाद जिल्ह्याचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक - आ. कैलास पाटील

 



 उस्मानाबाद जिल्ह्याचे  विविध प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक - आ. कैलास  पाटील



उस्मानाबाद  - मराठवाड्यासह उस्मानाबाद जिल्ह्याच्या प्रलंबित विषयाच्या बाबतीत मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी बैठक घेतली.बैठकीमध्ये कृष्णा-मराठवाडा प्रकल्प,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माती,स्वतंत्र विद्यापीठ निर्मीती,औद्यागिक वसाहतीचा विकास व तुळजापुर तिर्थक्षेत्र रेल्वेने जोडण्याच्या विषयावर प्राधान्याने चर्चा करण्यात आल्याची माहिती आमदार कैलास घाडगे पाटील यांनी दिली.बैठकीला आ. प्रा.तानाजी सावंत, खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आ. ज्ञानराज चौगुले यांची उपस्थिती होती. 


कृष्णा- मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा द्वीतीय सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रस्ताव नियामक मंडळाच्या 73 व्या बैठकीत मंत्रीमंडळाच्या मान्यतेसाठी शिफारस करण्याचा ठराव मंजुर आहे. त्यानुसार मंत्रीमंडळ बैठकीत प्रकल्पास द्वितीय सुधारीत प्रशासकीय मान्यतेबाबतचा निर्णय होण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच उपसा सिंचन योजना क्रमांक एक अंतर्गत दुधाळवाडी साठवण तलाव व उपसा सिंचन योजना क्रमांक दोन रामदरा साठवण तलाव पर्यंतच्या कामाच्या फेरनियोजनाचा प्रस्ताव तीन ऑगस्टच्या महामंडळाच्या पत्रानुसार शासनास सादर करण्यात आले आहे. त्यानुंषगाने फेरनियोजनाच्या प्रस्तावास तत्काळ मान्यता देण्याची मागणी यावेळी करण्यात आल्याचे आ. घाडगे- पाटील यांनी सांगितले. 


तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव ऑगस्टमध्ये झालेल्या मंत्रीमहोदयाच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे मंत्रीमंडळासमोर ठेऊन तो मंजुर करण्यात यावा अशीही मागणी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे  यांच्याकडे  करण्यात आली.विद्यापीठाबाबतही एक बैठक ऑगस्टमध्ये पार पडली होती,त्याचा संदर्भ देऊन त्या बैठकीत एका समितीची घोषणा करण्यात आली होती,त्याचे गठन होऊन त्या समितीकडुन तत्काळ अहवाल मागवुन घेण्याची गरज या बैठकीत व्यक्त करण्यात आली.कौडगाव एमआयडीसीमध्ये भेलच्या प्रकल्पाव्यतिरिक्त नविन उद्योग येण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्यासाठी स्थानिक उद्योगांनाही प्राधान्य देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. 


तसेच वडगाव (सि) येथील औद्योगिक वसाहतीसाठी भुसंपादन केलेल्या शेतकऱ्यांचा मावेजा रुपये 43 कोटी रुपये तातडीने वितरीत करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचीही मागणी या बैठकीत करण्यात आल्याचे आमदार घाडगे पाटील यांनी सांगितले.या महत्वाच्या विषयाच्याबरोबरच तुळजापुरला तीर्थक्षेत्र म्हणुन देशाच्या नकाशावर आणण्यासाठी रेल्वेने जोडणे आवश्यक आहे. हा रेल्वेमार्ग मंजुर असला तरी केंद्राकडुन या कामाबाबत म्हणावी अशी गती मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यासाठी राज्यसरकारकडुन हिस्सा घालुन हा मार्ग तातडीने पुर्ण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे आवश्यक असल्याची बाब बैठकीत मांडण्यात आली.मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेबांनी याबाबत सकारात्मक असल्याचे सांगुन सर्व मागण्या पुर्ण करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणार असल्याचे आश्वसन उपस्थित लोकप्रतिनिधीना दिल्याची माहिती आ. घाडगे -पाटील यांनी दिली आहे.

From around the web