अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे वृद्धापकाळाने निधन

 
अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे  वृद्धापकाळाने निधन
पुणे : सुप्रसिद्ध चरित्र अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे वय ८८ होते. आज दुपारी १२ वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

मोरूची मावशी या नाटकात जयराम यांनी सर्वात पहिल्यांदा काम केले होते. शाळेपासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. स. प. महाविद्यालयात श्रीकांत मोघे, शरद तळवळकर यांच्यासोबत पुलंच्या ‘अंमलदार’ नाटकात ‘हणम्या’ ही भूमिका जयराम यांनी साकारली. तेव्हापासून खणखणीत ग्रामीण भाषा बोलणारा एकच नट अशी त्यांची नवीन ओळख निर्माण झाली.

80 च्या दशकात अभिनेते जयराम कुलकर्णी यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अभिराज्य केले. धुमधडाका, नवरी मिळे नवऱ्याला, गंमत जम्मत, थरथराट, अशी ही बनवाबनवी, झपाटलेला, दे दणादण चल रे लक्ष्या मुंबईला, खट्याळ सासू नाठाळ सून, खरं कधी बोलू नये, माझा पती करोडपती, अशी ही बनवाबनवी, रंगत संगत अशा अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये महत्वाच्या चरित्र भूमिका केल्या आहे.

जयराम कुलकर्णी यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. इयत्ता सातवीत असताना त्यांनी 'मोरूची मावशी' नाटकात मावशीची भूमिका साकारली. गावात शिक्षणाची जेमतेम सोय असल्याने कॉलेज शिक्षणासाठी त्यांनी पुण्यातील स. प. महाविद्यालयात प्रवेश घेतला. पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकाही त्यांच्या गाजल्या. महेश कोठारेंच्या अनेक चित्रपटांत पोलिसांची भूमिका जयराम कुलकर्णी यांनी साकारल्या. जयराम कुलकर्णी यांच्या पत्नी आहेत डॉ. हेमा कुलकर्णी, तर त्यांचा मुलगा रुचिर हा पेशाने वकील आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या त्यांच्या स्नुषा आहेत.

जयराम कुलकर्णी यांचे मूळ गाव  उस्मानाबाद तालुक्यातील आंबेजवळगे आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील एक हरहुन्नरी अभिनेता गेल्याने अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे. 

From around the web