संपूर्ण राज्यात आज मध्यरात्रीपासून कलम 144 लागू : मुख्यमंत्री
Mar 22, 2020, 16:02 IST
मुंबई - कोरोना व्हायरस पसरू नये म्हणून महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातल्या संपूर्ण नागरी भागात उद्यापसून कलम 144 लागू करण्यात आलं आहे. आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका' असे आवाहन करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ही घोषणा केली आहे.
कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून महाराष्ट्र सरकार देखील लाॅकडाऊन करण्याच्या विचारात असल्याची माहिती समोर येत होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात आज मध्यरात्रीपासून कलम 144 लागू करणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. त्यामुळे पाचपेक्षा अधिक जण सार्वजनिक ठिकाणी फिरु शकणार नाहीत.
कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या गुणकाराने वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. त्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्य सरकारने नाईलाजाने हा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
कोरोना व्हायरसच्या संवेदनशील टप्प्यात आपण आहोत. त्यामुळे लोकल वाहतूक, रेल्वे वाहतूक, मेट्रो, लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या, खासगी बस सेवा बंद करण्यात आली आहे. लोकल बस वाहतूक ही केवळ अत्यावश्यक सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्वांना वर्क फ्रॉम होमचं आवाहनही केलं आहे. तसेच बंदच्या काळात घरी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी कंपन्यांना केलं आहे.