
कळंब बाजार समितीच्या संचाकलांना डांबून ठेवल्याच्या प्रकरणी उस्मानाबादचे खा.पद्मसिंह पाटील, त्यांचे आमदार पुत्र राणा जगजितसिंह पाटील यांना अटक करण्याच्या मागणीसाठी नागपुरात शिवसेनेच्या आमदारांनी मंगळवारी धरणे धरली तर उस्मानाबादेत याच मागणीसाठी शिवसेना, भाजप व काँग्रेसच्या नेत्यांनी जिल्हाधिका-यांना निवेदन दिले. कळंब प्रकरणावरून डॉ.पद्मसिंह पाटील विरोधी गट पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे.
परवा उस्मानाबादचे नवे पालकमंत्री व राज्याचे दुग्ध विकास व पशुसंवर्धन मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या सत्कार समारंभ निमित्ताने हे विरोधक एकत्र आले होते, त्याचवेळी हे विरोधक डॉ.पद्मसिंह पाटील यांना पुन्हा एकदा टार्गेट करणार, याची चुणचुण लागली होती, कळंब प्रकरणाचे या विरोधकांना कोलीत मिळाले आहे.
डॉ.पद्मसिंह पाटील यांचा उस्मानाबादच्या राजकारणावर गेल्या ३५ ते ४० वर्षापासून एकछत्री अंमल होता, ते अनेक वर्षे आमदार, कॅबिनेट मंत्री व आता खासदार आहेत. गेल्या ३० - ४० अनेक विरोधक आले व गेले, पण डॉ.पद्मसिंह पाटील यांचा बालही बाका होवू शकला नव्हता. ज्यांनी विरोध केला, नंतर तेच डॉ. पाटील यांचे जाहीर भाषणात गोडवे गायलाचे या जिल्ह्यातील जनतेने पाहिले होते, परंतु चुलत बंधु पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येनंतर डॉ. पाटील यांच्या राजकारणाला एक प्रकारचे ग्रहण लागले आहे. पहिला झटका तेरणा कारखान्याच्या निवडणुकीत बसला, नंतर जिल्हा परिषदेही हातची गेली व विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचे पुत्र राणा जगजितसिंह पाटील यांचा पराभव झाल्यानंतर आता डॉक्टरांचे राजकारण संपणार की काय शंका निर्माण झाली होती पण जि.म. बँकेच्या निवडणुकीत यश मिळाल्यानंतर त्यांना थोडे बळ आले, नंतर डॉ. पाटील यांनी काळाची गरज पाहून काँग्रेसच्या काही नेत्यांची मनोमिलन करून जि.म.बँकेत व जिल्हा परिषदेत बेरजेचे राजकारण केले होते, पण वर्षभरातच त्यांचे मनोमिलन संपुष्टात आले आहे. जि.म. बँकेत राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला बाजूला करताच काँग्रेसचे नेते विरोधात गेले. त्यांच्या छुप्प्या कारवाया सुरू झाल्या, काँग्रेसचे नेते मधुकरराव चव्हाण यांना कॅबिनेट मंत्री पाठोपाठ उस्मानाबादचे पालकमंत्री पद मिळताच काँगे्रसच्या नेत्यांना हत्तीचे बळ आल्यासारखे वाटू लागले आहे.
काँग्रेसच्या या नेत्यांनी शिवसेना व भाजपशी सलगी करून कळंब बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसला पहिला झटका दिला, आता त्यांची पुढची व्युहरचना सुरू झाली आहे. काँग्रेस, भाजप व शिवसेना ही विळ्या - भोपळ्याची मोट किती दिवस तग धरणार, हे पाहणेच आता उचित ठरणार आहे.
|