
भ्रष्टाचार आणि काळ्यापैशाविरोधात अण्णा-बाबांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला नवीन सोबत ‘अर्थक्रांती प्रतिष्ठान’ च्या रूपाने मिळू घातली आहे. मुख्य म्हणजे अण्णा हजारे, बाबा रामदेव, श्री श्री रवीशंकर आणि एपीजे अब्दुल कलाम यांना प्रेरणास्रोत मानणारे हे आंदोलन नव्या काळा-पैसा मुक्त सुदृढ अर्थव्यवस्थेची हाक घेऊन देशभर समर्पण यात्रेद्वारे फिरणार आहे. आयात शुल्कवगळता सर्व प्रचलित कर रद्द करावेत; बँकांमधील उलाढालींवर दोन टक्क्यांचा बँक व्यवहार-कर आकारला जावा; कालबद्ध कार्यक्रमानिशी १०० रुपये व त्यापेक्षा अधिक मूल्याच्या नोटा चलनातून बाद कराव्यात, २००० रुपयांवरील सर्व रोखीतील व्यवहारांचे कायदेशीर संरक्षण काढून घ्यावे, तर १०० रुपयांपर्यंतचे रोखीतील व्यवहार करबाह्य असावेत, अशी केवळ पाच कलमे महागाई, काळा पैसा, भ्रष्टाचार, रुपयाचे अवमूल्यन आणि चलनवाढ या जुन्या व्याधींनी ग्रस्त आपल्या अर्थव्यवस्थेच्या तंदुरूस्तीसाठी उपयुक्त ठरतील असे सुचविणारे ‘अर्थक्रांती’ आंदोलन सुरू होऊ घातले आहे. अर्थव्यवस्थेबाबत व्यापक जनजागृतीसाठी येत्या १५ जुलैपासून राज्यातील औरंगाबाद येथून देशव्यापी समर्पण यात्राही आंदोलनाकडून काढली जाणार आहे.
देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेला तारण्यासाठी केवळ थेट विदेशी गुंतवणूकच पर्याय असल्याचे भासविले जात आहे, परंतु देशांतर्गत उपलब्ध व्यावहारिक स्रोतांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे, असे प्रतिपादन अर्थक्रांती प्रतिष्ठानचे विश्वस्त अनिल बोकिल यांनी त्यांची संकल्पना स्वप्नरंजन असल्याचा आरोप धुडकावून लावताना केला. देशातील बँकांमध्ये आरटीजीएस सुविधेद्वारे प्रत्येकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या एकंदर १.७ लाख कोटी रुपयांचे व्यवहार होतात. या व्यवहार दोन टक्क्यांचा कर लावला तरी दिवसाला ३४०० कोटींचा महसूल गोळा होईल आणि वर्षांला ११.२५ लाख कोटी रुपये एकटय़ा या स्रोतातून कररूपाने विनासायास गोळा होतील. सध्या प्रत्यक्षकरांद्वारे गोळा होणारा महसूल १२.५ लाख कोटी रुपये असल्याचे बोकिल यांनी सांगितले.
अर्थक्रांतीचे प्रस्ताव तद्दन व्यवहार्य असल्याचे राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्यासह अनेक राजकीय पक्षांच्या व्यक्तींनीही मान्य केले असून, त्यासंबंधाने अंमलबजावणीची वेळ आली असल्याचे सांगितल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले. औरंगाबादमधून १५ जुलैपासून निघणाऱ्या समर्पण यात्रेद्वारे संपूर्ण देशभरात व्यापक जनजागृती करताना, पेट्रोलचे भाव ४२ रुपयांवर आणले जाऊ शकतील आणि सर्व प्रकारची कर्जे ४ टक्के व्याजदराने उपलब्ध होऊ शकतील, हे लोकांना सांगितले जाईल, असे अर्थक्रांतीचे प्रवक्ते आणि अभिनेते दीपक करंजीकर यांनी सांगितले.
|