
पुणे- मुंबईहून पुण्याकडे लग्नाचे व-हाड घेऊन जाणा-या दोन खासगी बसला रविवारी (ता.२७) मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई-पुणे- द्रुतगती महामार्गावर खालापूरजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात २७ प्रवासी मृत्यूमुखी पडले आहेत. तर ११ जण जखमी झाले आहेत. मृतात तीन लहान बालकांचा व ११ महिलांचा समावेश आहे. जखमींवर पनवेल येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांची नावे अद्याप समजू शकली नाहीत. विशेष म्हणजे याच गाडीत असणारे नवरा आणि नवरी हे दोघेही सुखरुप आहेत.
द्रुतगती मार्गावरील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील येरवडा येथे राहाणारे बवले यांच्या कुटुंबाचे हे व-हाड होते. दोन खासगी बसमधून घाटकोपर येथे लग्न उरकून सर्वजण पुण्याकडे येण्यास येत होते. रात्री एकच्या दरम्यान यातील एक बस पंक्चर झाली म्हणून दोन्ही चालकांनी आपापल्या बस खालापूर टोलप्लाझा पासून काही अंतरावर महामार्गाच्या लगत उभ्या केल्या होत्या. त्यावेळी वेळ जावा म्हणून बसमधील व-हाडी मंडळी पाय मोकळे करण्यासाठी बसमधून खाली उतरले. त्याचवेळी मुंबईकडून येणा-या भरधाव ट्रकने या व-हाडींना चिरडले. त्यात जागीच १८ जण ठार झाले. तर काहींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अपघाताचे वृत्त कळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. मृतांपैकी सर्वजण येरवडा भागातील शास्त्रीनगर, लक्ष्मी नगर, नागपुर चाळ येथील रहिवासी आहेत. या घटनेमुळे या परिसरात शोककळा पसरली आहे. जखमींना पनवेलच्या रुग्णालयात दाखल केले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
|