
नवी दिल्ली - भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने डिजिटल केबल नेटवर्कसंदर्भात नव्या नियमांची घोषणा केली असून, आता या नियमानुसार १०० रुपयात किमान १०० मोफत चॅनल प्रसारित करावी लागणार आहेत. हा नियम ३० जून २०१२ पासून देशभर लागू होणार आहे.
ट्रायच्या आदेशानुसार, बेसिक सर्व्हिस टायर (बीएसटी)ची सुविधा ग्राहकांना देणे केबलचालकांना बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, ही ग्राहकांसाठी बंधनकारक नाही.
या अंतर्गत किमान १०० चॅनेल मोफत दाखवावे लागतील. यात १८ चॅनल दाखवणे अनिवार्य करण्यात आले आहे. अनिवार्य चॅनेलमध्ये दूरदर्शनची सर्व चॅनेल्स, तसेच लोकसभा, राज्यसभा चॅनेल यांचा समावेश आहे. ग्राहकांना जर बीएसटीशिवाय काही पे-चॅनेल पाहायचे आहेत तर त्यासाठी १५० रुपये मासिक शुल्क द्यावे लागेल.
नव्या नियमानुसार..
टीव्ही वाहिन्यांचा ५ घटकांत ढोबळ विभागणी करण्यात आली आहे.
यात जनरल एंटरटेनमेंट चॅनल (जीईसी), इंग्लिश, जीईसी हिंदी, प्रादेशिक, संगीत, बातम्या, चित्रपट, क्रीडा, मुले (किड्स), माहिती व मनोरंजन (इन्फोटेनमेंट), जीवनशैली (लाइफस्टाइल) आदींचा समावेश आहे.
दिल्ली, मुंबई, कोलकाता व चेन्नई या महानगरात केबल टीवी डिजिटलायजेशनची मुदत ३० जून २०१२ ही निश्चित केली आहे.
देशात केबल टीव्ही डिजिटलायजेशन पूर्ण करण्यासाठी डिसेंबर २०१४ पर्यंत मुदत आहे.
|