
बुलडाणा - नागपूर-औरंगाबाद महामार्गावर मेहकरनजीक चिंचोली बोरे फाट्याजवळ आज (सोमवार) पहाटे झालेल्या भीषण अपघातात १५ प्रवासी ठार झाले असून पाच जणांची प्रकृती चिंताजनक बनलेली आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अपघातात ३५ जखमी असून वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी, आज पहाटे तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास नागपूर व पुण्याकडे जात असलेल्या खासगी प्रवासी लक्झरी बसेसची समोरासमोर धडक झाली. रस्त्यावर असलेला खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात चालकांचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. यामुळे दोन्ही बसेस समोरासमोर आदळल्याने अचानक पेटल्या. काही क्षणात दोन्ही बसेसला आगीने वेढले. यामुळे आतील प्रवाशांच्या एकच किंकाळ्या निघाल्या. जो तो आपला जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करू लागला. पहाटेची वेळ असल्याने प्रवासी झोपलेले होते. त्यामुळे अनेकांना जीवसुद्धा वाचविता आला नाही. यामुळे १५ जण होरपळून ठार झाले. घटनेची माहिती कळताच मेहकर शहरातील नागरिक, चिंचोली बोरे गावातील काही जण धावले. दोन्ही गाड्या अवघ्या काही वेळात जळून खाक झाल्या. मृतक प्रवाशांविषयी सध्या काहीही माहिती समोर आलेली नाही. नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक आदी ठिकाणचे काही मृतक असल्याचा अंदाज असून पोलिस नातेवाइकांशी संपर्क साधत आहेत. जखमीवर मेहकर ग्रामीण रुग्णालय, खासगी हॉस्पिटल तसेच गंभीर जखमींना औरंगाबाद येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
|