
कळंब (भिकाजी जाधव) - देवदर्शन करुन नवरी व नवरदेव दुचाकीवरुन गावाकडे परतत असताना एसटी बसची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात नवरदेव जागीच ठार तर नवरी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना वडगाव (ता. कळंब) पाटीजवळ आज शुक्रवार रोजी दुपारी एक वाजता घडली. ’ भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अर्धावरती डाव मोडीला, अधुरी एक कहाणी’ या गीताप्रमाणे अंगावरची हळद निघण्यापूर्वीच नवरदेवाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
रविराज दत्तू कोकाटे (वय २५ वर्षे, रा. ढोकी, ता.जि.उस्मानाबाद) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या नवरदेवाचे नाव आहे. तर शैला रविराज कोकाटे (वय २१ वर्षे) असे गंभीर जखमी झालेल्या नवरीचे नाव आहे. रविराज व शैला यांचा विवाह अवघ्या चार दिवसापूर्वी म्हणजे दि. २० मे रोजी मोठ्या थाटामाटाने झाला होता. कोकाटे नवदाम्पत्य येरमाळा येथील येडेश्वरी देवीचे दर्शन घेण्यासाठी ढोकी येथून शुक्रवार दि. २४ मे रोजी गेले होते. येडेश्वरी देवीचे दर्शन घेऊन गावाकडे मोटारसायकल क्रमांक एम.एच. २५ एस. ३०९७ यावर स्वार होवून परतत असताना वडगाव पाटीजवळ दुपारी एक वाजता तुळजापूर-नाशिक एसटी बसची (क्रं. एम.एच. ४० एन. ९७४३) व मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात नवरदेव रविराज यांचा जागीच मृत्यू झाला. तर शैला हिच्या डोक्याला दुखापत झाल्याने गंभीर जखमी झाली. त्यास पुढील उपचारासाठी उस्मानाबाद येथील जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अंगावरची हळद सुकण्यापूर्वीच व भावी संसाराबदल पाहिलेले स्वप्न या अपघातामुळे आधुरे राहिले, अशा त-हेने रविवराजचा मृत्यू झाल्याने ढोकी गावासह व परिसरात शोककळा पसरली.
सायंकाळी करण्यात आले अंत्यसंस्कार
रविराज यांचा बांधकाम साहित्य विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचा व शैला यांचा विवाह चार दिवसांपूर्वीच झाला होता. मात्र, विवाहाची हळद पुसून जाण्याअगोदरच काळाने अशी दुर्दैवी झडप घातल्यामुळे संपूर्ण गावात शोकाकूल वातावरण निर्माण झाले होते. नातेवाइकांसह गावातील नागरिकही गगनाला भिडणारा आक्रोश करीत होते. अशा वातावरणातच रविराज यांच्या पार्थिवावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
|