
उस्मानबाद - पावसाळा सुरू होवून एक महिना झाला तरी जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झालेला आहेत. उण्यापु-या पावसावर जिल्ह्यात केवळ १५ टक्के पेरण्या झालेल्या आहेत.जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस न झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
पावसाळा सुरू होऊन महिना गेला तरीही जिल्ह्यात अद्याप पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरिपाच्या पेरणीवर मोठा परिणाम झालेला दिसून येत आहे. आजअखेर जिल्ह्यात केवळ १५ टक्केच पेरण्या झाल्या असून, शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. पावसाळा सुरू होवून एक महिना उलटला तरी अद्याप पेरणीयोग्य पाऊस झाला नाही.परिणामी जिल्ह्यातील खरिपाच्या ३ लाख ९४ हजार हेक्टर खरीप क्षेत्रापैकी केवळ जवळपास साठ हजार हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली असून, आतापर्यंत फक्त १४ ते १५ टक्केच पेरणी पूर्ण झाली आहे. त्यातच खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेल्या मूग, उडीद, संकरित ज्वारी, भुईमूग तीळ, सोयाबीन आदींमध्ये मोठी घट झाली आहे.
जिल्ह्य़ात आतापर्यंत सरासरी १०९.७ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. यात उस्मानाबाद तालुक्यात सर्वात कमी तर लोहारा तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील पेरणी झालेल्या ५० हजार ५६३ हेक्टर क्षेत्रात सर्वाधिक सोयाबीन तर सर्वात कमी क्षेत्र तीळाचे आहे. कमी पाऊस झाल्यामुळे पेरणीला उशिर झाल्यामुळे मूग, उडीद, भुईमूग या पिकांना शेतकरी फाटा देत सोयाबीन पिकाकडे वळल्याचे दिसून येत आहे.
|