
उस्मानाबाद - बीडच्या घटनेनंतर राज्यात सध्या भ्रुण हत्त्येचा विषय सध्या चांगलाच गाजत आहे. उस्मानाबाद जिल्हा शासकीय रूग्णालयात गेल्या काही दिवसांत ६८ गर्भपात करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.चक्क शासकीय रूग्णालयातच मुलींची कत्तल करण्यात येत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
कोवळ्या कळ्यांची मातेच्या उदरातच हत्या करणार्या बीड जिल्ह्यातील अनेक खाजगी डॉक्टरांभोवती पोलिस कारवाईचा फास आवळण्यात आला आहे. असे असतानाच अन्य काही जिल्ह्यातही असे प्रकार उघडकीस आले. त्यामुळे शासनाने याबाबतीत कडक पाऊले उचलित राज्यभरातील गर्भलिंग निदान व गर्भपात केंद्रांची अचानक तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार उस्मानाबाद जिल्हातील सर्व केंद्रांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये अनियमितता आढळून आलेल्या काही केंद्रावर तसेच डॉक्टरांवर कारवाईही झाली.
दरम्यान, सदरील कारवाईचा धसका मान्यताप्राप्त गर्भपात केंद्रचालकांनी घेतला असून ते आता वैद्यकीय गर्भपात करण्याचेही टाळू लागल्याचे सूत्रांकडून समजते. पर्यायाने सिव्हिल हॉस्पिटलच्या केंद्रातील वैद्यकीय गर्भपाताची आकडेवारी वाढल्याचे सांगण्यात येत आहे. एप्रिलपूर्वी जिल्हा रुग्णालयातील अबॉर्शनचे प्रमाण सरासरी दरमहा १० ते १५ इतके होते. परंतु, एप्रिलनंतर या प्रमाणात झपाट्याने वाढ झाली आहे. एप्रिलमध्ये विविध करणांवरून ३० अबॉर्शन झाले होते. हा आकडा मे महिन्यामध्ये वाढून ३४ वर पोंहचला आहे. दरम्यान, जून महिन्यात ही संख्या जवळपास दुप्पटीने वाढली. सदरील तीस दिवसांत सुमारे ६८ वैद्यकीय गर्भपात झाल्याची नोंद झाली असल्याची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली.
वीस आठवड्यानंतर वैद्यकीय अबॉर्शन करण्यास परवानगी नाही. कारण या कालावधीनंतर गर्भाच्या सर्व अवयवांची पूर्ण वाढ झालेली असते. दरम्यान, बारा आठवड्यांपर्यंत वैद्यकीय गर्भपातास पूर्ण परवानगी आहे. परंतु, बारा आठवड्यांनंतर दोन स्त्रीरोग तज्ज्ञांचे मत जाणून घेतले जाते. त्यानंतरच गर्भपात केला जातो.
एखाद्या मातेच्या उदरातील गर्भाची व्यवस्थित वाढ होत नसेल, जन्म झाल्यानंतर बाळ जगण्याची शक्यता नसेल, अतिप्रसंगानंतर गर्भधारणा झाली असेल, बाळाच्या जन्मानंतर मातेचे आरोग्य धोक्यात येणार असेल तर संबंधित मातेला गर्भपात करून घेण्याचा अधिकार असल्याचे प्रभारी शल्य चिकित्सक डॉ. छंच्छुरे यांनी सांगितले.
|